Vishal Borkar (Journalist)
View Point News
राज्यात नव्या वर्षात थंडीची चाहूल लागली आहे. तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यात गारठा वाढणार आहे. पुढील काही दिवस राज्यातील हवामान कोरडे राहणार असून किमान तापमानात २ ते ३ अंश डिग्री सेल्सिअसने घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या चारही उपविभागात पुढील काही दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर तापमानात २ ते ३ अंश डिग्रीसेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. पुणे शहर व परिसरात पुढील काही दिवस आकाश मुख्यत: निरभ्र राहून सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रावरही धुक्याची चादर आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात थोडी वाढ झाली आहे. विदर्भात मात्र, काही जिल्ह्यात गारठा कायम आहे. पुढील काही दिवसांत थंडीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
पश्चिमी झंझावातामुळं व उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवामानामुळे राज्यातील हवामानात पुढील काही दिवसांत मोठा बदल होणार आहे. दक्षिण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा व समुद्राच्या पाण्याच्या बाष्पीभवनामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागावरही ढगांचं सावट असून थंडी कमी झाली आहे. पुढील २४ तासांमध्ये हे वातावरण कायम राहणार असून किमान तापमान १५ अंशांच्या वर राहणार आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडी वाढली आहे. मागील तीन दिवसांमध्ये राज्याच्या काही भागांत गारपीट आणि पाऊस झाला होता. तर पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. सध्या राज्यातील थंडी गायब झाली असली तरी नवीन वर्षाच्या सुरवातीला तापमानात पुन्हा घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राजस्थान व परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या परिसरापासून उत्तर गुजरातपर्यंत हवेचा कमीदाबाच्या पट्ट्याचीही निर्मिती झाली आहे. तर पूर्वेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे आग्नेय अरबी समुद्रापासून दक्षिण महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विरून गेला आहे.
